मुंबईत कोरोनाचा फैलाव थांबविण्यासाठी युद्धपातळीवर काटेकोर पाऊले उचलण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले असून सर्व २२७ वॉर्डमध्ये पालिकेची भरारी पथके मंगळवारपासून घराघरांमध्ये तपासणी सुरु करणार आहेत.
राज्यांतील इतर जिल्ह्यांच्या तुलनेने मुंबईमधील लोकसंख्या,दाट लोकवस्ती तसेच विषाणू प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेऊन काल मुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगरपालिकेस हे निर्देश दिले. सोमवारी उद्धव ठाकरेंनी महापालिका उपायुक्त तसेच वॉर्ड अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे बैठक घेतली व महत्वपूर्ण सूचना केल्या़.
कोणत्याही परिस्थिती फैलाव थांबवा
वरळी कोळीवाड्यात कोरोनाची लागण झाल्यानंतर संपूर्ण कोळीवाडाचा परिसर दुषित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलाय. नागरिकांच्या हालचालीवर निर्बंध आले आहेत. या घटनेनंतर मुंबईत साथ फैलावून आणखी दुषित क्षेत्र निर्माण झाल्यास आरोग्य यंत्रणा तसेच प्रशासनाला हा फैलाव आटोक्यात आणण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. मुंबई हे देशातील एक प्रमुख शहर असून आर्थिक राजधानी आहे. याठिकाणी कोणत्याही परिस्थिती नियंत्रणात राहिली पाहिजे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की तातडीने भरारी पथके सक्रीय करून तपासणीस सुरुवात झाली पाहिजे.
या पथकांकडे एक वाहन तसेच पालिका अधिकारी- कर्मचारी, पोलीस तसेच महसूल विभागाचा कर्मचारी व वैद्यकीय सहायक असेल. हे पथक कोरोनाविषयक रुग्ण , त्यांच्या संपर्कात आलेले लोक यांची माहिती प्रत्यक्ष जाऊन घेतील तसेच ताप. सर्दी, न्युमोनिया सदृश्य आजार असलेले लोक देखील शोधतील व त्यांच्या तपासणीसाठी तातडीने पुढील कार्यवाही करतील.
प्रसंगी कठोर निर्णय घ्यावे लागतील
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून २४ तास जीवनावश्यक वस्तूंची दुकाने , औषधांची दुकाने सुरु ठेवली. मात्र याचा गैरफायदा घेऊन लोक फिरायला निघाल्यासारखे दिसून येत असेल तर ही सोय बंद करण्याचा कठोर निर्णय प्रसंगी घ्यावा लागेल.
कोरोना रोखायाचाच आहे हे आव्हान आपण पेलले असून राज्य सरकार पालिकेच्या संपूर्ण पाठीशी आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, उपायुक्त, तसेच प्रभागांशी संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या नियमित कामे आणि कोरोना नियंत्रण काम यात व्यवस्थित नियोजन करावे., कामाचे नीट वाटप करावे. स्वत:वरचे इतर कामांचे ओझे कमी करून कोरोनावर लक्ष केंद्रित करा.
खासगी डॉक्टर्सची मदत घ्या
आपापल्या वॉर्ड मधल्या खासगी डॉक्टर्सना दवाखाने सुरु करण्याची विनंती करा, त्यांना आवश्यक ते मास्क द्या, पण नियमित रुग्ण तपासण्यास सुरुवात झाली तर शासकीय आरोग्य यंत्रणेवरचा ताण कमी होईल असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.